धाराशिवः राज्यामध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन पेटलेलं आहे. त्यामुळे शासन स्तरावरुन मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ज्यांचे पुरावे सापडले आहेत, त्यांना तातडीने कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यासंबंधीचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
मंगळवारी राज्य शासनाने कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात निर्णय घेतल्यानंतर बुधवारी धाराशिव जिल्ह्यातील एका मराठा बांधवाला कुणबी प्रमाणपत्र जिल्हाधिकाऱ्यांनी सुपूर्द केलं होतं. परंतु सायंकाळी लाभार्थ्यानेच ते प्रमाणपत्र जाळून टाकलं आणि राज्य शासनाचा निषेध केला.
धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी धाराशिवमधील सुमित माने यांना पहिलं कुणबी प्रमाणपत्र सुपूर्द केलं होतं. सुमित यांनी प्रमाणपत्र स्वीकारताना म्हटलं होतं की, सरकारने मराठा समाजाला सरसकट प्रमाणपत्र द्यावे, नसता मी हे परत करणार आहे.
बुधवारी सायंकाळी सुमित माने यांनी मराठा आंदोलकांसह मिळालेलं कुणबी प्रमाणपत्र जाळून टाकलं. ते म्हणाले की, मला एकट्याला प्रमाणपत्र देऊन चालणार नाही. माझे बांधव आहेत त्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं. एकट्याला जेवायला द्यायचं आणि बाकीच्यांना उपाशी ठेवायचं, आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न असेल तर आम्ही त्याची होळी करु. सकाळी माझी दिशाभूल झाली होती, असं माने यांनी स्पष्ट केलं.