ताडकळस : यावर्षी उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलेले आहे. महाराष्ट्रात या वर्षी उसाची टंचाई असल्यामुळे साखर कारखान्यांमध्ये ऊस पळवा पळवी होणार आहे. सुदैवाने आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा साखरेला चांगला भाव आहे. साखर कारखान्यांना इथेनॉल मधून चांगला पैसा मिळतोय. परंतू ऊस उत्पादित शेतक-यांना उसाचा जास्त मोबदला मिळत नाही. शेतक-यांनी ऊस घालायला गडबड करण्यापेक्षा उसाला चांगला दर मिळण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी असे आवाहन माजी खा. राजू शेट्टी यांनी केले आहे.
पूर्णा तालुक्यातील ताडकळस गोपाल जिनिंगच्या मैदानावर झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस, कापूस, सोयाबीन परिषदेस ताडकळस व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या परीषदेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी खा. राजु शेट्टी बोलत होते. यावेळी स्वाभिमानी प्रदेशाध्यक्ष डॉ प्रकाश पोपळे, स्वाभिमानी महिला प्रदेशाध्यक्षा सौ.रसीका ढगे, युवक प्रदेशाध्यक्ष दामु आण्णा इंगोले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रामप्रसाद गमे, युवा जिल्हाध्यक्ष गजानन तुरे, परभणी तालुकाध्यक्ष मुंजाभाऊ लोडे, पुर्णा तालुकाध्यक्ष
पंडित(आण्णा)भोसले, बालकिशन चव्हाण, राम दुधाटे, नागेश दुधाटे, सचिन शिंदे, पांडुरंग आंबोरे, केशव अरमळ, बाळासाहेब घाटोळ, रामेश्वर आवरगंड ,नवनाथ दुधाटे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. यावेळी माजी खा. शेट्टी, स्वाभिमानी प्रदेशाध्यक्ष डॉ. पोपळे, स्वाभिमानी महिला प्रदेशाध्यक्षा सौ.रसीका ढगे, युवक प्रदेशाध्यक्ष दामु आण्णा इंगोले यांच्यासह उपस्थित पदाधिका-यांचा ताडकळस व परिसरातील शेतकरी बांधवांच्या वतीने उसाची मोळी भेट देऊन सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना माजी खा. शेट्टी म्हणाले की, शासन दरबारी शेतक-यांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना नेहमीच अग्रेसर असते. जे आज सत्तेत आहेत त्यांना शेतक-यांची प्रश्न तातडीने का सोडवत नाहीत असा तर जे आज सत्तेत नाहीत त्यांना तुम्ही शेतक-यांसाठी आता पर्यंत किती प्रयत्न केले असा जाब विचारू. जोपर्यंत शासनाचे धोरण बदलत नाही तोपर्यंत शेतक-यांचे प्रश्न सुटणार नाहीत. ती पॉलिसी बदलावी यासाठी सरकारकडे आम्ही पाठपुरावा करू असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
या ऊस, कापूस व सोयाबीन परिषदेसाठी परभणी जिल्ह्यातील पूर्णा, पालम, गंगाखेड, ताडकळस, चुडावा, महागाव, कळगाव, बाणेगाव, धानोरा (काळे), मुंबर, देऊळगाव दुधाटे, फुलकळस, माखणी, खडाळा, लिमला आदी परिसरातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऊसाला किमान ३३०० रूपयांचा दर द्यावा
परभणी जिल्ह्यात यावर्षी जो उस उभा आहे त्याला जिल्ह्यातील कारखान्यांनी किमान ३३०० रुपये प्रमाणे भाव द्यावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना संपूर्ण परभणी जिल्ह्यातील शेतक-यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असणार आहे. जोपर्यंत शासनाच्या वतीने व साखर कारखान्याच्या वतीने उसाला योग्य भाव देण्याचे जाहीर करत नाहीत तोपर्यंत एक उसाचे कांडे सुद्धा तोडले जाणार नाही याची दक्षता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने व शेतकरी बांधवांच्या वतीने घेण्यात येणार आहे असा इशारा माजी खा. राजू शेट्टी यांनी ताडकळस येथील परिषदेत बोलताना दिला.