परभणी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त ग्रामपंचायत स्तरावर दि.०९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत आयोजित मेरी मिट्टी मेरा देश हा उपक्रम परभणी जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांनी केले आहे.
मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमांतर्गत शिला फलक, वसुधा वंदन, पंचप्राण प्रतिज्ञा आणि प्रत्येक घरावर ध्वजारोहण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत विविध गावातून एका कलशात माती जमा करण्यात येणार आहे. तालुकास्तरावर प्रत्येक तालुक्यातून असे कलश दि.२७ ते ३० ऑगस्ट दरम्यान दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात नेण्यात येणार आहेत. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणा-या सर्व विरांप्रति मनातील भावना व्यक्त करणे हा या उपक्रमाचा मूळ उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गाव, ग्रामपंचायती मधून माती जमा करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील अमृत सरोवरा जवळ शीलाफलक उभारणी करावी, अमृत वाटिका अंतर्गत जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायतीने ७५ वृक्षांची रोपे लावायचे असून यासाठी सर्व पंचायत समितीने नियोजन करावे असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांनी संबंधितांना दिले आहेत. मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमांतर्गत अमृत सरोवर जलस्त्रोता शेजारी शिराफलक उभारणी, पंचप्राण प्रतिज्ञा व सेल्फी, वसुधा वंदन, वीरोका नमन, ध्वजारोहण व राष्ट्रगान या कार्यक्रमांचा सहभाग राहणार आहे. या कार्यक्रमाचे नोडल अधिकारी म्हणून तालुका स्तरावरील सर्व गटविकास अधिकारी यांना जबाबदारी देण्यात आली आहे.