नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांमध्ये ऐक्य निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 18 विरोधी पक्षांच्या बैठकीत सर्व पक्ष इतर कोणत्याही विरोधी पक्षाच्या आणि विशेषतः त्यांच्या मित्रपक्षांच्या भावनिक मुद्द्यांवर वक्तव्य करणार नाहीत यावर सहमती झाली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी हस्तक्षेप केल्याचं सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांना आश्वासन दिले आहे की, ते सावरकरांच्या मुद्द्यावर वक्तव्य करणार नाहीत. खरे तर राहुल गांधींनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने या बैठकीवर बहिष्कार टाकला होता.
या बैठकीत विरोधकांनी 5 मोठे मुद्दे निश्चित केले. तसेच काँग्रेस पुढे यायला हवं, असं सांगण्यात आलं. काँग्रेसने सक्रियता वाढविण्याची गरज आहे, यावर चर्चा झाली. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.
सोमवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी काँग्रेससह 18 राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. मात्र, या बैठकीत उद्धव ठाकरेंचे वर्चस्व राहिले. उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत झालेल्या या बैठकीत वि.दा.सावरकरांसारख्या संवेदनशील विषयावर विरोधी पक्षांनी भाष्य करणे टाळण्याचा निर्णय घेण्यात आला.
राहुल गांधींनी नुकतेच सावरकरांवर केलेल्या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे संतापले होते. त्यांनी जाहीर सभेत यावर नाराजी दर्शवली होती. त्यामुळेच ते या बैठकीला अनुपस्थित राहिले होते. खासदार म्हणून अपात्र ठरल्यानंतर राहुल गांधी म्हणाले होते की, “माझे नाव सावरकर नाही… गांधी आहे, मी कधीही माफी मागणार नाही.”