चांदवड (जि. नाशिक) : कांद्याला पुरेसा भाव नाही, उत्पादनखर्चही पदरात पडत नाही, शेती पूर्ण तोट्यात चाललीय, पैसेच नसल्यानं कुटुंब चालवणं अवघड झालंय. मुलांचं शिक्षण कसं करायचं, खायचं काय?
जर शेती करून काही मिळणारच नसेल तर मरणाची तरी परवानगी द्या म्हणत चांदवडच्या शेकडो शेतकऱ्यांनी राष्ट्रपतींकडे स्वेच्छामरण मागितले आहे. कांद्याला भाव नसल्याने जगणं अवघड झालं आहे. त्यापेक्षा मरणाची तरी परवानगी द्यावी, अशी मागणी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुका हा ‘कांदा व द्राक्षाचे’ प्रमुख उत्पादन असलेला तालुका. यंदा मात्र येथील शेतकरी पुरता कोलमडला आहे, तो कांदा आणि द्राक्षाच्या घसरलेल्या भावाने. सरकारचे आयात-निर्यात धोरणाचा फटका या शेतकऱ्यांना बसला आहे.
राज्यकर्ते कांदा व द्राक्ष, तसेच भाजीपाला मालाला योग्य व रास्त बाजारभाव देण्यास सातत्याने असमर्थ ठरत आहे. यंदा तर उत्पादनखर्चही निघू शकत नसल्याने आर्थिक गणितच बिघडले आहे. शेतकऱ्यांना कुटुंबाचे व त्याचे पालनपोषण करणे अशक्य झाले आहे.
त्यामुळे हताशपणे त्यांनी प्राण त्यागाला परवानगी द्या, असा पर्याय केंद्र व राज्य सरकारला दिला आहे. किमान उत्पादनखर्च निघेल आणि शेतकऱ्याला जगता येईल एवढा तरी भाव मिळावा किंवा अनुदान द्यावे, ही त्यांची प्रमुख मागणी आहे.
शेतकऱ्यांचा राज्यांच्या विधानसभेत व राज्यसभेत सत्ताधारी राज्यकर्ते विचार करत नाही. सबब विनंती, की शेतकऱ्यांना स्वेच्छामरण्याची परवानगी मिळावी ही विनंती, अशा आशयाचे पत्र माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय जाधव, विजय जाधव, संपतराव वक्टे, उत्तमराव ठोंबरे, अनर्थ पठाण, दीपांशू जाधव, दत्तू ठाकरे, समाधान जामदार, शंकरराव जाधव, सागर निकम, मधुकर निकम, दत्तू कोतवाल, ज्ञानेश्वर कोतवाल, शंकरराव शिरसाठ, नंदू कोतवाल, भीमराव निरभवणे आदींसह शेकडो शेतकऱ्यांनी भारताच्या राष्ट्रपतींकडे पाठविले आहे.