राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मंत्रिमंडळ विस्तारावरून दररोज बैठकी सुरू आहेत. यादरम्यान महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे.
दरम्यान ज्या पक्षाकडे आमदारांची संख्या जास्त आहे त्याच पक्षाचा विरोधी पक्षनेता असेल, असे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. यादरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दिल्लीत दाखल झाले आहेत.
विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद कोणाला मिळणार यावरून चर्चा सुरू असतानाच नाना पटोले यांना पक्षश्रेष्ठींनी तात्काळ दिल्लीला बोलावून घेतलं आहे. काँग्रेसमधून विरोधी पक्षनेता पद कोण द्यायचे यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पावसाळी अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षनेता काँग्रेस ठरवणार होती, त्या नावावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. चार दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांसोबत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी बैठक घेतली होती, त्यानंतर आज पुन्हा पटोले यांना दिल्लीतून बोलावणं आलं आहे.
मागील काही दिवसांपासून विरोधी पक्ष नेतेपद कोणाला मिळणार तसेच काँग्रेसचा महाराष्ट्रतील प्रदेशाध्यक्ष बदलाणार का? या दोन प्रश्नांची जोरदार चर्चा होत आहे. यावर दिल्लीत काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांचे मंथन सुरू आहे.
मात्र राज्यातील प्रदेशाध्यक्ष न बदलण्याची हायकमांडची मानसिकता असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे नाना पटोले यांचं काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र विधानसभेतील विरोधी नेतेपद कोणाला मिळणार याबद्दल अद्याप स्पष्टता नाहीये. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहावे लागणार आहे.
या नावांची चर्चा
दरम्यान अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गट एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर आमदारांच्या संख्येनुसार विरोधी पक्ष नेते पद काँग्रेसकडे येण्याची शक्यता आहे. या पदासाठी काँग्रेसमधून अनेक नेत्यांची नावे समोर येत आहेत. ज्यामध्ये ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नाना पटोले, यशोमती ठाकूर, सुनील केदार, विजय वडेट्टीवार या नावांची चर्चा सर्वाधिक होताना दिसत आहे.