परभणी : परभणी जिल्ह्यामध्ये वादळ वारे आणि गारपिटीचा कहर सुरू असून सोनपेठ पाठोपाठ मानवत परिसरात देखील तुफान गारपिट झाली आहे. सुमारे एक तास सुरू असलेल्या या गारपिटी दरम्यान मोठमोठ्या गारांचा खच पडलाय. त्यामुळे शेतातील उरल्या-सुरल्या पिकांचं नुकसान झालं आहे. दुसरीकडे पूर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथे शेतामध्ये काम करत असताना एका ३२ वर्षीय युवकाच्या अंगावर वीज कोसळून त्याचा मृत्यू झाला आहे. अगोदरच शेतकरी संकटात असताना पुन्हा जिल्ह्यावर गारपिटीचं संकट आलंय.
मागील आठ ते दहा दिवसांपासून परभणीमध्ये अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यासह हजेरी लावत आहे. अशातच काल परभणीच्या पूर्णा तालुक्यात गारपीट झाली होती. त्यामुळे शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याचे पहावयास मिळाले होते. असे असतानाच दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज मानवत तालुक्यातील पार्डी,सोमठाणा, नरळद, निलवर्ण टाकळी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सायंकाळच्या वेळी गारपीट झाली. त्यामुळे शेती पिकाचे नुकसान झाले आहे.