महाराष्ट्र सरकारला म्हणजेच शिंदे फडणवीस सरकारलाच महाराष्ट्रात दंगली घडवायाच्या आहेत असा गंभीर आरोप आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. कोल्हापूरमध्ये हिंदू संघटनांनी आंदोलन केलं. औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्याने हा प्रकार घडला. त्या विषयावर बोलत असताना जितेंद्र आव्हाड यांनी हा गंभीर आरोप केला आहे.
काय म्हणाले आहेत जितेंद्र आव्हाड?
“मी तीन महिन्यांपूर्वी बोललो होतो. महाराष्ट्रात वारंवार दंगली घडवल्या जातील. जे चांगलं चाललं आहे त्यात वातावरण बिघडवण्याचं काम केलं जाईल. शासनाला काहीही करुन दंगली हव्या आहेत. महाराष्ट्राचं वातावरण इतकं खराब आहे की आज निवडणूक झाली तर महाविकास आघाडीला २०० जागा मिळतील. त्यामुळेच निवडणूक होईल तेव्हा होईल पण तोपर्यंत वातावरण बिघडवून टाका, खराब करुन टाका असं या सरकारचा प्रयत्न आहे.” असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
कोल्हापुरात शिवराज्यभिषेक दिनाच्या दिवशी म्हणजेच ६ जून रोजी काही आक्षेपार्ह स्टेटस विशिष्ट धर्माच्या लोकांनी फोनवर ठेवली होती. तसंच दोन दिवसांपूर्वी अहमदनगर या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी निघालेल्या संदलमध्ये औरंगजेबाचे फोटो नाचवले गेले. त्यानंतर कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी बंदची हाक दिली आहे. कोल्हापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी कार्यकर्ते एकवटले. पोलिसांनी या ठिकाणी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
या आंदोलना दरम्यान पोलिसांसह धक्काबुक्कीचे काही प्रकार झाले. त्यामुळे आंदोलकांवर सौम्य लाठीचार्जही करण्यात आला आहे. या घटनेनंतर आता आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण केलं जातं आहे. औरंग्याच्या इतक्या अवलादी कुठून पैदा झाल्या त्याचा शोध आम्ही घेत आहोत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तर आता या सरकारलाच दंगली हव्या आहेत असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.