राजकीय पक्षांच्या फायद्यासाठी महाराष्ट्रात दंगली घडवल्या जातायत? अजित पवार म्हणाले…
सोशल मीडिया अकाऊंटवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. आज सकाळपासूनच कोल्हापूर शहरातील व्यवहार पूर्णतः बंद आहेत. तर संबंधित तरुणांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. सोशल मीडिया अकाऊंटवर मुघल बादशाह औरंगजेबाचा फोटो ठेवून औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारा मजकूर शेअर करण्यात आला होता. त्याविरोधात कारवाई करावी यासाठी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केलं. त्यानंतर शहरात काही ठिकाणी दगडफेक झाली. शहरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन कोल्हापुरात जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
दरम्यान, याप्रकरणी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रश्न विचराले. राजकीय पक्षांच्या फायद्यासाठी दंगली घडवल्या जातायत का? असा प्रश्न अजित पवारांना विचारल्यावर ते म्हणाले, त्यासंदर्भात चौकशी केली पाहिजे. परंतु माझ्यासारख्यांनी तुम्ही (पत्रकार) प्रश्न विचारल्यावर पूर्णपणे माहिती न घेता असे कोणाबद्दलही आरोप करायचे किंवा एखाद्याला टार्गेट करायचं माझ्या बुद्धीला पटत नाही. राज्यकर्त्यांचं काम आहे की त्यांनी अशा वेळी इतर गोष्टींना अधिक महत्त्व देण्याऐवजी हे का घडतंय, असे प्रकार का वाढतायत ते तपासावं.
अजित पवार म्हणाले, राज्यकर्त्यांनी या परिस्थितीला अधिक महत्त्व देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवून हे का वाढतंय, राज्यात काय चाललंय, हे सगळं कशामुळे होतंय, हे थांबवायला काय करायला पाहिजे ते तपासावं. तसेच ज्या व्यक्तिंबद्दल लोकांमध्ये द्वेष आहे अशा लोकांचे फोटो नाचवले जातात, ते मीडियात दाखवले जातात, ते खरंच आपल्या महाराष्ट्रात घडतंय की, बाहेरच्या कुठल्या क्लिप आणून सोशल मीडियावर दाखवल्या जात आहेत हे तपासलं पाहिजे. या सगळ्यामधून वातावरण खराब केलं जात आहे याची चौकशी करायचं काम पोलीस आणि सरकारचं आहे.