मुंबई : मागील काही दिवसापासून सोशल मीडियावर महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचे विविध आकाडे प्रकाशित केले जात आहेत. आता याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी खुलासा केला आहे. ते म्हणाले, जागा वाटपाचे चर्चेत येणारे आकडे मनोरंजक आहेत. सध्या केवळ चर्चा सुरू असून महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत निश्चिती झाली नसल्याचा दावा त्यांनी केला.
पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, ईडीची पहिली कारवाई माझ्यावर झाली. त्या वेळी या यंत्रणेविषयी कुणाला माहिती नव्हती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ईडीला सांगितले आहे की भीती निर्माण करू नका. त्यातून सत्ताधाऱ्यांनी बोध घ्यावा. राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष जयंत पाटलांच्या समर्थनार्थ आंदोलने हा दबाव टाकण्याचा प्रयत्न नाही तर चुकीच्या पद्धतीने कारवाईविरोधात कार्यकर्त्यांचा आक्रोश आहे. दंगली म्हणजे निवडणूक जवळ आली आहे, असे समजण्यासारखे वातावरण आहे. कर्नाटकमध्ये हिजाब, बजरंगबली हे भाजपचे मुद्दे निवडणुकीत पराभूत झाले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. असे हि ते म्हणाले.