जरांगेंच्या आंदोलनावर एसआयटी चौकशीचे आदेश
विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर एसआयटीमार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मंगळवारी विधानसभेच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला. मनोज जरांगे यांच्या वक्तव्यावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. मराठा आंदोनावरुन विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गोंधळ झाला. जरांगेच्या वक्तव्यावरून सभागृहात वाद झाला.
विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
जरांगेंच्या आंदोलनावर बोलताना अशिष शेलार यांनी विधानसभेत म्हटलं की, कोपर्डी केसमधील आरोपींना कोर्टाच्या आवारात जाऊन मार हे सांगितलं आम्हाला असा आरोप आहे. पिस्तुल कोणाकडे सापडली, लोकप्रतिनीधींची घर जाळली, याची चौकशी नको का, असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला. यासोबत एसआयटी लावा, अशी मागणीही केली आहे. याच्या मागे या सभागृहातील सदस्य कोण आहे याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अमित साटम यांनीही केली आहे.
जरांगेंच्या आंदोलनावर एसआयटी चौकशीचे आदेश
विधानसभा अध्यक्षांनी जरांगेंच्या आरोपांची चौकशी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. हिंसा अथवा हिसंक वक्तव्य याला लोकशाहीत स्थान नाही. यासाठी योग्य उपाय योजना करण्याची जबाबदारी शासनाची आहे. याच गांभीर्य लक्षात घेत शासनाने याची सखोल एसआयटी चौकशी करावी, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.
फडणवीसांती पहिल्यांदाच जरांगे पाटलांवर प्रतिक्रिया
मनोज जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटील यांच्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ”मला बोलायचं नव्हतं. मराठा समाजच्या संदर्भात मी काय केलं हे महाराष्ट्राला माहीत आहे. मी मुख्यमंत्री असताना आरक्षण दिल ते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात टिकवलं, सारथीला निधी शिष्यवृत्ती दिली, कर्ज दिले. मराठा समाज्यातल्या संदर्भात मला कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही. जरांगे पाटील माझ्यावर बोलले त्यानंतर मराठा समाज माझ्या पाठीशी उभा राहिला, त्यांच्यापाठीशी नाही”, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
‘जरांगेंना घरी भेटायला कोण गेलं?’
शिवाजी महाराजांचं नाव घ्याचचं आणि दुसऱ्यांना शिव्या द्यायच्या. लाठीचार्जच्या आधी मनोज जरांगे यांना परत कोणी आणलं, त्यांना घरी कोणं भेटलं, हे शोधायला हवं असं फडणवीसांनी म्हटलं आहे. आरोपी सांगत आहे की, दगडफेक करायला कोणी सांगितले. पोलीस आपले नाहीत का? समाजाला विघटीत करण्याचा प्रयत्न होतोय. त्यांना पैसे कोण देतेय, त्यांना मदत कोण करतंय, हे सर्व बाहेर येईल, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
जरांगेंचा बोलवता धनी कोण? फडणवीसांचा सवाल
जरांगेंवर बोलताना फडणवीसांनी म्हटलं की, जर आयमाय काढणार असेल तर योग्य नाही. तुमच्या बदल जर कोणी बोलले तर, तुमच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस राहतील. जरांगे पाटील यांच्या संदर्भात मला घेणं देणं नाही, मात्र त्यांचा बोलवता धनी कोण आहे हे शोधल जाईल. औरंगाबाद याठिकाणी वाॅर रुम कोणी सुरु केली, याची सखोल चौकशी होईल, असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.