छत्रपती संभाजीनगर :यंदा दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी संकटात सापडला आहे. अशात बँकेची कर्ज परतफेडीची नोटीस आल्याने या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. नारायण भाऊसाहेब करंगळ (वय 43 वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
अधिक माहितीनुसार, पैठण तालुक्यातील कुतुबखेडा येथील शेतकरी नारायण भाऊसाहेब करंगळ यांनी पेरणीसाठी पैठणच्या बँक ऑफ बडोदा बँकेकडून 4 लाख 75 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, आज नारायण करंगळ यांचे हेच कर्ज व्याजासह 7 लाख 11 हजार 940 रूपये झाले आहे. तसेच, हे कर्ज भरण्याबाबत संबंधित बँकेकडून नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, यंदा अपेक्षित पाऊस झाला नसल्याने पीकं देखील जगवणे अवघड झाले. अशा परिस्थितीत बँकेचे कर्ज कसे फेडायचे या चिंतेत नारायण करंगळ यांनी आत्महत्या केल्याचं त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे.
बँकेची नोटीस आल्याने होते चिंतेत…
करंगळ यांना यावर्षी चांगला पाऊस होईल अशी अपेक्षा होती. मात्र, पैठण तालुक्यात खरिपाच्या वेळी दुष्काळ पडला, तर रब्बीच्या वेळी अतिवृष्टीचा फटका बसला असल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीमुळे लावलेला पैसेही निघणे अवघड असल्याची परिस्थिती आहे. त्यात, घरातील सर्व जबाबदारी नारायण यांच्यावर असल्याने ते सतत चिंतेत असायचे. दरम्यान, बँकेची कर्ज परतफेडीची नोटीस आल्याने त्यांची चिंता आणखीनच वाढली होती. मुलांचे शिक्षण, त्यात घर चावण्यासाठी लागणार पैसा कुठ्न आणणार याची चिंता त्यांना सतावत होती. बँकेकडून आलेल्या नोटीसमध्ये 9 डिसेंबर रोजी सकाळी कोर्टामध्ये तडजोड करण्यासाठी यावे अन्यथा तुमच्यावरती कारवाई करण्यात येईल असा उल्लेख करण्यात आला होता. परंतु कर्जाची तडजोडीसाठी जवळ पैसे नसलेले कोर्टामध्ये जाणे शक्य झाले नाही, आता बँकेचे अधिकारी आपल्याला पैसे भरला तकदा लावतील या विवंचनेतून त्यांनी रविवारी शेतामध्ये जाऊन विषारी औषध प्राशन करत आत्महत्या केली.
शेतात विष प्राशन करून घर गाठले…
सायंकाळी नारायण करंगळ हे शेतातून घरी आल्यानंतर त्यांनी शेतातच विष प्राशन केल्याचे त्यांच्या पत्नीच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती नातेवाइकांना दिली. नातेवाईकांनी नारायण करंगळ यांना खाजगी वाहनांच्या मदतीने पाचोड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.बाबासाहेब घुगे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले आहे. या घटनेची पाचोड पोलिस ठाण्यांमध्ये करण्यात आली असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.