नवी दिल्ली : देशभरात मान्सूनचे आगमन झाले आहे. उत्तर प्रदेश-मध्य प्रदेशसह २० राज्यांमध्ये पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत देशात सरासरीपेक्षा ८% कमी पाऊस झाला आहे.
तर, उत्तर-पश्चिम भारतात सरासरीपेक्षा ४०% जास्त पाऊस झाला. दक्षिण भारतात सामान्यपेक्षा ४३% कमी. मध्य भारतात ४ टक्के कमी पाऊस झाला. पूर्व आणि ईशान्य भारतात १६% कमी पाऊस झाला. दुुसरीकडे बिहारमध्ये नेपाळमधून पाणी येत असल्याने पुराचा धोका निर्माण झाला आहे. बिहारमध्ये वीज पडून तिघांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी, यूपीमध्ये मुसळधार पावसामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कुशीनगर दौरा रद्द करण्यात आला आहे. पंतप्रधान ७ जुलैला येथे येणार होते.
मान्सून देशात सर्वत्र पोहोचला असून जुलै महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज असून मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल. मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, लातूर या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम तर विदर्भातील अकोला, अमरावती, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात ८ जुलैपर्यंत यलो अलर्ट नागपूर वेधशाळेने जाहीर केला आहे. तसेच विदर्भात विजांच्या कडकडाटासह ढगांचा गडगडाट देखील राहणार आहे. राज्यात सोमवारी बहुतेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली होती.