पूर्णा : तालुक्यातील चुडावा, गौर, ताडकळस, लिमला, कावलगावमध्ये मंगळवार, दि.२५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास वादळी वा-यासह पाऊस व गारपीट झाली. गारपीटीमुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. गारपीटग्रस्त शेतक-यांच्या पिकांचेपंचनामे करून तात्काळ मदत जमा करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार बोथीकर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पूर्णा तालुक्यातील चुडावा, पिंपरण, धानोरा मोत्या, धनगर टाकळी, कंठेश्वर, चांगेफळ, कावलगाव, गौर, लिमला या गावामध्ये दि.२५ एप्रिल रोजी मोठ्या प्रमाणात वादळी वा-यासह पाऊस व गारपीट झाल्यामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात रब्बी पिकाचे, बागायती पिकाचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेत पिकाचे पंचनामे करून गारपीटग्रस्त शेतक-यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यासाठी तसेच शेतक-यांना फळ बागायती १ लाख रुपये व २०२१ ते २०२२ वाढीव पिक विमा अनुदान चालू बाकीदार ५० हजार रुपये शेतक-याच्या खात्यावर वर्ग करण्यात यावेत.
तसेच चुडावा कावलगाव, गौर, लिमला, ताडकळससह पूर्णा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतक-यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ प्रेम देसाई यांच्या वतीने तहसीलदार बोथीकर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तसेच प्रहार जनशक्ती पक्ष तालुकाच्या वतीने गारपीटग्रस्त शेतक-यांचे पंचनामे करून तात्काळ येत्या आठ दिवसात शेतक-यांच्या खात्यावर नुकसान भरपाईचे पैसे वर्ग करावेत अन्यथा या विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर प्रहारचे उपजिल्हाप्रमुख नरेश जोगदंड, तालुका अध्यक्ष शिवहार सोनटक्के आदींच्या स्वाक्षरी आहेत.