रांची : झारखंड उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना मोठा धक्का दिला आहे. भाजप नेते अमित शहा यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप राहुल गांधींवर आहे. याप्रकरणी २०२२ मध्ये कोर्टाने राहुल गांधींना दिलासा दिला होता. दरम्यान, या प्रकरणावर पुन्हा सुवावणी होणार असून राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
न्यायमूर्ती अनिलकुमार चौधरी यांच्या खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार, चाईबासा न्यायालयात दाखल केलेल्या फौजदारी तक्रारीला आव्हान देणा-या याचिकेवर सुनावणी करण्यास राहुल गांधी तयार नाहीत असे न्यायालयाने निरीक्षण केले आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
२०१८ मध्ये चाईबासा येथे झालेल्या काँग्रेसच्या कार्यक्रमादरम्यान राहुल गांधी यांनी भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, एक खुनी व्यक्ती केवळ भाजपमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतो, काँग्रेसमध्ये नाही. राहुल गांधींनी अमित शहा यांच्याविरोधात केलेल्या या वक्तव्यावर आक्षेप घेत भाजप नेते नवीन झा यांनी कनिष्ठ न्यायालयात याचिका दाखल करून मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल गांधी यांच्या बाजूने न्यायालयात युक्तिवाद करताना वकील पियुष चित्रेश म्हणाले की, ज्या प्रकारचे आरोप केले जात आहेत ते योग्य नाहीत.