मान्सूनची आगेकूच, पुढच्या २ दिवसांत अरबी समुद्रात बरसणार; हवामान खात्याचा अंदाज
मुंबई : हवामानात वारंवार होणाऱ्या बदलांमुळे वातावरणात ऊन-सावलीचा खेळ सुरू आहे. अशात एल निनोचा प्रभाव असल्यामुळे यंदा मान्सून ८ दिवस उशिराने बंगालच्या उपसागरात दाखल झाला आहे. १९ मे पासून अंदमान आणि निकोबार बेटांवर अडकलेल्या नैऋत्य मान्सूनने अखेर वेग धरला आहे. येत्या २ ते ३ दिवसांमध्ये मान्सून मालदीव बेटे, कौमारिन क्षेत्र आणि बंगालच्या उपसागरातील काही भागांत व अरबी समुद्रातील काही भागांमध्ये हजेरी लावण्याची शक्यता आहे. कारण, मान्सून पुढे सरकण्यासाठी आता अनुकूल स्थिती असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, १५ जूनपासून देशातल्या बहुतांश भागांमध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मान्सूनने २२ ते २६ मे या कालावधीत अंदमान आणि निकोबार बेटे ओलांडून पुढे बंगालच्या उपसागरात सरकायला हवे होते. पण हवामानातील बदलांमुळे याला विलंब झाला. पण अखेर आता मान्सून पुढे सरकला आणि बुधवारीच तो बंगालच्या उपसागरात दाखल झाला.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मान्सूनचा हा वेग पाहता केरळमध्ये आणि तामिळनाडूमध्ये १ जूनला तर ५ जूनपर्यंत कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि ईशान्येत मान्सूनला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर १० जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये पोहू शकतो. १५ जूनपासून गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या बहुतांश भागात मान्सूनचा पाऊस सुरू होईल. राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल आणि जम्मू-काश्मीरमध्ये २० जूनपासून पावसाला सुरुवात होईल तर मान्सूनचा हा टप्पा ८ जुलैपर्यंत सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
केरळमध्ये दाखल झाला तर तो जुलैच्या मध्यापर्यंत संपूर्ण देश व्यापतो. अशात मान्सून ७ जूनच्या सुमारास दक्षिण महाराष्ट्रात प्रवेश करतो, तर १५ जूनपर्यंत संपूर्ण राज्य व्यापतो. पण सध्याच्या हवामानातील स्थितीमुळे मान्सूनला ४-५ दिवस उशिरही होऊ शकतो. म्हणजेच म्हणजेच मुंबईत मान्सून साधारणपणे १० जूनला येण्याची अपेक्षा असते. पण यंदा तो १५ जूनच्या आसपास उशिरा पोहोचू शकतो.