बुद्ध व डॉ.बाबासाहेबांचे विचार मनाला प्रेरणा देणारे – डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे
आम्रवण महाविहार देवगाव फाटा येथे १३ वी अ.भा.बौद्ध धम्म परिषद उत्साहात संपन्न.
परभणी – डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भारत बुद्धमय करण्याचे स्वप्न होते बुद्धांचे धम्मचक्र गतिमान झाले पाहिजे. गेल्या वर्षी पहिली भव्य धम्म पदयात्रा आयोजित केली. दुसरी धम्मयात्रा लेह – लडाख पर्यंत काढण्यात आली. याशिवाय भारतातून ५१ श्रामनेर संघासह तिसरी धम्म पदयात्रा ही थायलंड देशात आयोजित केली. येणाऱ्या काळात देशात सहा हजार की.मी.ची भव्य धम्म पदयात्रा काढण्यात येणार आहे. बुद्ध डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मनाला प्रेरणा देणारे आहेत असे मार्गदर्शन डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे (अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनु. जाती विभाग) यांनी व्यक्त केले.
डॉ. बी.आर.आंबेडकर धम्म संस्कार केंद्र आम्रवन महविहार देवगाव फाटा ता. सेलू जिल्हा परभणी येथे प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी १३ वी अ. भा.बौद्ध धम्म परिषद दि. २४ फेब्रुवारी रोजी (माघ पौर्णिमा) निमित्त उत्साहात व धम्ममय वातावरणात पार पडली. धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थानी भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो , (कार्याध्यक्ष अ. भा.भिक्खू संघ) यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना सिद्धार्थ हत्तीअंबिरे म्हणाले की, जगात बुद्धाचा धम्म एक नंबरचा आहे. डॉ. बाबासाहेबांनी देशाची घटना लिहली आहे . येणार काळ हा संघर्षाचा असून देशातील मनुवादी सरकार बाबासाहेबांनी लीहलेली घटना नेस्तनाबुत करण्याचे काम करीत आहे. म्हणून सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे असे ते म्हणाले. यावेळी भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो धम्मदेसनापर मार्गदर्शन करताना म्हणाले कि, धम्माचे संस्कार केंद्र , विपश्यना केंद्र ठिकठिकाणी होत आहे.पाली भाषा, बौद्ध अध्ययन व अध्यापनाचे काम झाले पाहिजे. तक्षशिला, नालंदा ही विद्यापीठ होती. आपल्यातील अज्ञान दूर झाले पाहिजे. सिद्धार्थ हत्ती अंबिरे यांनी धम्म पदयात्रा यशस्वी केली. ते राजकारणात असून त्यांचे धम्माचे कार्य सुरू आहे. धम्म पद यात्रेत बुद्धाच्या अस्थी घेऊन लाखोच्या संख्येने लोक सहभागी झाले होते.
पुढे बोलताना भदंत डॉ. उपगुप्त म्हणाले की, आपल्यातील अभिमान ,गर्व ,मीपणा गेला पाहिजे. पवित्र पुण्याचे काम करावे . शिलाचे आचरण कुशल काम करावे. बुद्ध विहार जागेचा विकास उन्नती झाली पाहिजे असे ते म्हणाले. यावेळी भदंत शरणानंद महाथेरो , भदंत इंदवंश महाथेरो , यांची धम्मदेशना पार पडली. धम्म परिषदेला भंते शिलरत्न , संयोजक भंते संघरत्न भिक्खू संघ तसेच कन्ट्रक्टर गौतम भोळे, उपासक दिलीप गायकवाड, मधुकर गायकवाड ,पी जी रणवीर पूर्णा आदींची उपस्थिती होती.
सकाळी १० वाजता आम्रवण महाविहार येथे भदंत शरणानंद महाथेरो यांच्या हस्ते पंचरंगी धम्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. परिषदेच्या सुरुवातीस देवगाव फाटा ते आम्रवन महविहारा पर्यंत बुद्ध डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे भिक्खू , श्रामनेर संघासह मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत विद्यार्थीनीचा लेझिम संघ सहभागी झाला होता. सामूहिक बुद्ध वंदना पूजा विधी घेण्यात आला . या धम्म परिषदेला परिसरातील उपासक महिला मंडळ – पुरुष धम्म बांधव युवा वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सर्वांना भोजन दान करण्यात आले.