राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे, तर काही भांगामध्ये अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. पुणे, मुंबईसह उपनगरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. तसेच ठाणे, पालघर याचबरोबर कोकण परिसरात चांगलाच पाऊस आहे. तर अद्याप काही भागांमध्ये पावसाने दडी मारली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकण परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट दिला आहे.
तर पुढील 4 दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. पुढील 4 दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर आज कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुणे आणि ठाण्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला असून दोन्ही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबईत आज पावसाचा जोर काहीसा कमी होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर 5 जुलैपासून पुढील 3 दिवस मुंबईत मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. तर कालपासून पुण्यात पावसाचा जोर ओसरला आहे. तर पुण्यातही पुढील 4 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.