“जरा थांबा हो, शरद पवारांनी अजून फोनाफोनी सुरू केलेली नाही”, जितेंद्र आव्हाडांचं सूचक विधान; नेमकं काय घडणार?
राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. अजित पवारांनी विरोधी पक्षनेते पद सोडून सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. राजभवनात आज त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांनी आता पक्षनाव आणि पक्षचिन्हावर दावा ठोकला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाडांनी उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे.
राज्याच्या विरोधी पक्षनेते पदी जितेंद्र आव्हाडांची नियुक्ती
माझ्या भूमिकेवर पवारांचं कायम प्रेम होतं. त्यांच्या प्रेमामुळेच मी भूमिका घेत होतो. शोषितांच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या चेहऱ्याला साहेबांनी आज विरोधी पक्षनेता केलं आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. माझ्यादृष्टीने शरद पवारच राष्ट्रवादीचे नेते आहेत. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की पक्षनाव आणि निषाणी कोणी घेऊ शकणार नाही, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले. “ज्या अर्थी साहेब कारवाई म्हणत आहेत, तोवर सुरू होईल. आता राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांकडेच आहेत.माझी प्रतोद आणि विरोधी पक्षनेते पदी निवड केली आहे. त्यामुळे प्रतोद जो व्हिप काढेल तोच लागू होईल.”
इतके निष्ठूर कसे झालात?
“कित्येकांच्या बायका, पोरं, नातेवाईक फोन करत आहेत, आम्ही समजावतो म्हणून. कारण गावात वातावरण खराब व्हायला लागलं आहे. काही गावात उद्रेक सुरू झाला आहे. लोकं सहन नाही करत. लोकं जे परंपरेने शरद पवारांचे विरोधकही असतील ते मान्य करतात की पवारांनी एकहाती मोकळं मैदान दिलं होतं. तुम्ही मंत्री झालात तुम्ही चार आमदार तरी निवडून आणले. त्यांनी आमदार निवडून आणले. आजारपणात सभा घ्यायच्या. माणूस जिवंत असेल तर हृदयाला चिंता बसत असेल की काय करतोय. एखाद्या पोराने म्हाताऱ्या बापाला घरातून बाहेर काढावं, त्या बापाला काय वाटत असेल हे आपण कथांमध्ये वाचलं आहे. आपण इतके निष्ठूर झालो आहोत की दुःखाची छटा तुमच्या तोंडावर दिसत नाही,” असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष पद बदलण्याच्या हालचाली सुरू होत्या. यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता जितेंद्र आव्हाड म्हणाले, ” प्रदेशाध्यक्ष पद दुसऱ्या दिवशी बदलता येत नाही. जो माणूस आहे त्याला विश्वासात घ्यावं लागेल. शेवटी क्रिया, प्रतिक्रिया, संवाद करूनच एकत्रित निर्णय होतो. पक्षाध्यक्ष नेमला आणि काम झालं असं होत नाही.”